सोलापूर : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवी जीवन तणावग्रस्त होत आहे. या तणावातून मुक्ती मिळविण्याचा सोपा उपाय म्हणजे योग. योगाभ्यास हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. मानवी दीर्घायुष्याची, तसेच निरोगी तणावमुक्त आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे. याचा प्रसार व्हावा म्हणून २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून साजरा व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आणि २०१५पासून तो अंमलातही आला.
सोलापूर येथील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय व विवेकानंद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रा. पी. एस. स्वामी यांनी प्रार्थना म्हणून विविध आसने व सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रा. शिवराज पाटील व अनंत गवळी यांनी सूर्यनमस्कार व आसनांचे महत्त्व आणि फायदे सांगितले. ‘प्राणायाम ही गोष्ट टीव्हीवर पाहून किंवा एका दिवसात साध्य होणारी नव्हे. त्याकरिता योग्य प्रशिक्षकाची आवश्यकता असते. तसेच थोडा वेळ देऊन ही गोष्ट आत्मसात करता येते. परंतु अर्धवट ज्ञानाने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात,’ असे त्यांनी सांगितले. याबरोबरच त्यांनी विवेकानंद केंद्रात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व त्यांचा लाभ घेण्याचे प्राध्यापकांना आवाहन केले. नियमित योगासने करण्याचा संकल्पही या वेळी सर्वांनी केला.
सर्व प्राध्यापकांनी योगासने केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सेक्रेटरी एस. ए. पाटील़, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. पी. एस. स्वामी यांनी संस्थेतर्फे विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता क्रीडा प्रशिक्षक प्रा. कोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.